साधारणणे १९६२ पासून टाकळी देवस्थानात अनेक बेकादेशीर व्यवहार सुरु होऊन दैनंदिन, वार्षिक धार्मिक विधी, पुजा-अर्चा, सायं दिवाबत्ती वगैरे बंद झाली. पुरातन दोन मजली मठ पूर्णपणे पाडला गेला, उरला फक्त १०’*१०’ चा गाभारा.
हे सर्व थांबविण्यासाठी श्री समर्थ तपोभूमीस पुर्नवैभव प्राप्त होण्यासाठी नाशिक - टाकळी परिसरातील श्री समर्थ भक्तांनी "श्री समर्थ रामदास सेवा मंडळाची" स्थापना केली. सन १९७० मधे जिर्णोध्दाराचा मार्ग सोपा होण्याचा दृष्टीने मठाधिपतीशी खूप चर्चा केली, पण काही उपयोग झाला नाही तेव्हा, धर्मदाय आयुक्त मुंबई ह्यांचेकडे मठाधिपती विरुध्द दावा करावा लागला. मंडळाचा दावा योग्य आहे हे मान्य होऊन सन १९७२ साली धर्मदाय आयुक्त मुंबई ह्यांनी जि. न्यायालय नाशिक येथे मठाधिपती विरुध्द दावा दाखल केला. त्याचा निकाल १.९.१९८४ साली जाहीर होऊन संपूर्णपणे मठाधिपती विरुध्द निकाल लागला. दाव्याच्या मागणीप्रमाणे सगळी स्थावर व जंगम मालमत्ता देवस्थानाच्या मालकीची म्हणून जाहीर झाली. मठाधिपती दिनकर बुवास काढून नवीन विश्वस्थांची नेमणूक करावी असा आदेश होऊन घटना ( स्किम ) करुन देण्यात आली. नंतर बुवाने मुंबई उच्चन्यायालयाकडे अर्ज करुन वरील निकालावर स्थगिती (स्टे) मिळवली. उच्चन्यायालयात १ मार्च २००५ मधे बुवा विरुध्द निकाल लागून बुवाचा अर्ज रद्द करुन जि. न्यायालय नाशिक ह्यांना मंदिरासाठी विश्वस्तांची नेमणूक व घटना करुन देण्यास सांगितले. उच्चन्यायालय मुंबई ह्यांच्या सुचनेप्रमाणे श्री समर्थ रामदास सेवा मंडळाने पुन्हा जि.न्या. नाशिक यांचेकडे अर्ज केला. त्याचा निकाल २०.१२.२०१२ रोजी जाहीर झाला. मा.जि.न्यायालयाने घटना मंजूर करुन सात विश्वस्तांची नेमणूक करुन दिली.
जि.न्यायाधिश नाशिक हे किंवा त्यांनी नेमून दिलेले न्यायाधिश नाशिक हे कायम न्यासाचे अध्यक्ष असतील. तहसिलदार नाशिक पदसिध्द हे आणि जि.न्या.नाशिक ह्यांनी नियुक्त केलेले इतर पाच असे एकूण सात विश्वस्त असतील. विश्वस्तांची एक टर्म पाच वर्षांची असून एक व्यक्ती फक्त दोन टर्मसाठीच विश्वस्त राहू शकते. तसेच कायम जि.न्या. नाशिक हेच विश्वस्तांची नेमणूक करतील.
पहिले विश्वस्त मंडळ अध्यक्ष मा. पी. एस. घाटे अॅडी. डि.जज् नाशिक, श्री. सुधीर शिरवाडकर, अॅड. दिलीप कैचे, श्री. ज्योतीराव खैरनार, आर्की. प्रकाश पवार, अॅड.सौ. विजया महेश्वरी, तहसीलदार नाशिक असे विश्वस्त आहेत.
१)श्री समर्थ स्थापित श्री गोमय हनुमान मंदिराचा जीर्णोध्दार करणे.
२)गोदा नंदिनीच्या संगमावर श्री समर्थ तपश्चर्या स्थान निर्माण करणे.
३)श्री समर्थ शिकवणीचा, विचारांचा प्रसार प्रचार करणे. त्यासाठी योग्य असतील ते सर्व प्रयत्न करणे.
४)देवस्थानचे सर्व दैनंदिन, मासिक, वार्षिक उत्सव रामदासी संप्रदायानुसार साजरे करणे.
५)मंदिराचे परिसरात दर्शनार्थींसाठी सुख सोई उपलब्ध करुन देणे.
६)टाकळी गावांत मंदिराजवळ गोदावरी काठी असलेल्या मठाच्या महाधिपतींच्या समाध्यांचा जिर्णोध्दार करणे.